नांदेड:(15 नोव्हेंबर)
      प्रतिनिधी

        महाराष्ट्रातील विभागीय नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोने मांजरम ता.नायगाव येथे एक ट्रक पकडून त्या ट्रकमधून 1170 किलो गांजा पकडला आहे. हा गांजा 12 टायरच्या ट्रकमध्ये लोखंडी साहित्यात लपवून वाहतुक केला जात होता. हा गांजा जळगाव येथे पोहचती करायचा होता अशी माहिती नारकोटीक्स ब्युरोचे विभागीय अधिकारी समिर वानखेडे यांनी प्रसिध्दसाठी दिली आहे.
     मुंबई येथील एनसीबी पथकाला एका ट्रकनंबरसह मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एनसीबी पथकातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी मागील दोन दिवसापासून नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वावरत होते. आज पहाटे 4 वाजता देगलूरकडून आलेला ट्रक क्रमांक एम.एच.26 ए.डी.2165 हा नरसी गडगा मार्गे पुढे जात असतांना एनसीबी पथकाच्या गाडयांनी त्या ट्रकचा पाठलाग करून तो ट्रक मांजरम जवळ पकडला. त्यात एकूण 1127 किलो गांजा होता. या गांजाची किंमत जवळपास 7 कोटी असे सांगण्यात आले. एनसीबीच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार हा गांजा जळगाव येथे पोहचती करायचा होता. एनसीबी पथकाचे अधिकारी अमोल मोरे, सुधाकर शिंदे, संजय गवळी, प्रमोद मोरे, कृष्णा पारमद्देकर आदी या कार्यवाहीमध्ये सहभागी झाले होते. एनसीबी पथकामध्ये या संदर्भाने गुन्हा क्रमांक 98/2021 दाखल केला आहे. या प्रकरणात ट्रकचा चालक व मालक गोकुळ नारायण आणि ट्रक क्लिनर सुनिल यादव  अशा दोघांना एनसीबी पथकाने ताब्यात घेतले आहे. एनसीबी पथकाने दिलेल्या माहितीनुसार एवढी मोठी कार्यवाही एनसीबीने पहिल्यांदाच केली आहे. हा गांजा अनिल नावाच्या माणसाला जळगाव येथे द्यायचा होता
अशी माहिती आहे.